निर्बंधांचं पालन केलं नाही तर गुन्हे दाखल करावे लागतील - आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा
राज्यात काल ३६ हजार करोना रुग्ण आढळून आले असून आपण आता हळू हळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. आता लावलेल्या निर्बंधाचं पालन करणं गरजेचं असून जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे,असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय निर्बध कडक करावे लागतील असा इशारा देखील टोपे यांनी दिलाय.
चित्रपट, नाट्यगृह,मंदिरं याबाबत लगेचच निर्बंध लावण्याचा प्रस्ताव नसून गरज पडली तर निर्बंध लावले जातील. मात्र या ठिकाणांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे टोपे यांनी सांगितले. अनेक जिल्ह्यात शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या ठिकणी करोना रुग्णसंख्या वाढत आहे त्यामूळे तो निर्णय घेण्यात आल्याचे देखील टोपेंनी स्पष्ट केलं.
दरम्यान, राज्यात लसीकरण वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून १० तारखेनंतर बुस्टर डोस घ्यावा. या महामारीतुन नागरीकांना फक्त लस वाचवेल अशी विनंतीही त्यांनी नागरिकांना केलीय. लसीकरणामुळे करोना बाधितांची संख्या कमी झाली असून पूर्वीपेक्षा कमी रुग्ण संख्या आहे, असंही ते म्हणाले.