आघाडी सरकार हरवलं, शोधून देणाऱ्यास पुरस्कार देणार - देवेंद्र फडणवीस 

आघाडी सरकार हरवलं, शोधून देणाऱ्यास पुरस्कार देणार - देवेंद्र फडणवीस 

लाखणी -

राज्यातील आघाडी सर्व सामान्यांचं राहिलं नाही. हे सरकार काम करताना दिसत नाही. हे सरकारच हरवलं आहे. शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. लाखणी येथे उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता देवेंद्र फडणवीस बोलत होते. हे सरकार सामान्य माणसांचं नाही. सामान्य माणसाच्या विरोधातील हे सरकार आहे. या सरकारला तुम्हीच खालू आणू शकता असं फडणवीस म्हणाले.

या सरकारला मराठा आरक्षण देता आलं नाही. ओबीसी आरक्षण रद्द करण्याचे पाप या सरकारने केलं आहे. ओबीसी आरक्षण रद्द केल्याने ओबीसींचं राजकीय प्रतिनिधीत्वच धोक्यात आलं आहे. या सरकारने इम्पिरिकल डेटा वेळीच जमा केला असतास तर आज ही वेळ आली नसती, असं सांगून फडणवीस पुढे म्हणाले की,  मी मुख्यमंत्री असताना धानाचा बोनस देण्याची सुरुवात केली. पूर्वी आम्ही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घोषणा करायचो. पण या सरकारने बोनसच बंद केला आहे, असं सांगतानाच नाना पटोले म्हणतात संविधान खतरे में है. पण खरेतर धान पीक घेणारे शेतकरीच खतरे में आहेत, असा हल्लाही त्यांनी चढवला. आम्ही 5 वर्षात एकाही शेतकऱ्यांची वीज कापली नाही. मात्र या सरकारच्या काळात रोज वीज कापली जात आहे. एका डीपीवर 4 शेतकऱ्यांनी वीज भरली नाही तर पूर्ण डीपी काढून नेण्याचे काम केले गेले आहे, असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या काळात या सरकारने जराही मदत केली नाही. बार मालक शरद पवारांकडे गेले. तिथे गेल्यावर त्यांनी लायसन्स फी कमी करून घेतली. विदेशी दारुवर 50 टक्के कर माफ करून घेतला. विदेशी दारु स्वत झाली. हे दीन दलित, गरीबांचे सरकार नसून दारु विकणाऱ्यांचे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.