वीर सावरकर आमचे दैवत, पुन्हा अवमान केला तर…; उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा

राहुल गांधींना आजच्या सभेत जाहीरपणे सांगत आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान केलेला आम्ही कदापि सहन करणार नाही.

वीर सावरकर आमचे दैवत, पुन्हा अवमान केला तर…; उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा

मिंद्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार का ? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल.

शिंदेंच्या शिवसेनेवर गद्दारीचा कायमचा शिक्का बसल्याची टीका

मालेगाव - मोदी आडवावरून केलेल्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. यावर काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी ‘माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे, गांधी कधी माफी मागत नाही,’ अशी टीप्पणी केली होती. यावरून आज मालेगाव येथील जाहीर सभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट राहुल गांधींना इशारा दिला आहे. सावरकर आमचे दैवत आहेत. त्यांचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना इशारा दिला.

मालेगावच्या एमएसजी (मसगा) कॉलेजच्या मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. तेव्हा बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राहुल गांधींनी प्रश्न विचारला २० हजार कोटी रूपये कोणाचे? त्यावर भाजपकडे कुठलेही उत्तर नाही. हिंडेनबर्ग हजारो कोटी रूपयांचे घोटाळे उघड करत आहे. पण, भाजप त्याला कवडीचीही किंमतही देत नाही. पंतप्रधान उत्तरही देत नाही. आमच्याकडे साध्या-साध्या लोकांच्या पाठीमागे ईडी, सीबीआय लावून घोटाळे काढण्यात येत आहेत.

पण राहुल गांधींना एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पायी भारत जोडो यात्रा काढली. त्या यात्रेत संजय राऊत आणि आम्हीही तुमच्याबरोबर होतो. ही लढाई लोकशाहीची आहे. मात्र, राहुल गांधींना आजच्या सभेत जाहीरपणे सांगत आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान केलेला आम्ही कदापि सहन करणार नाही. लढण्यासाठी आमच्या दैवतांचा अपमान सहन आम्ही करणार नाही, असे म्हणत त्यांनी थेट राहुल गांधींना इशारा दिला.

सावरकर काय होते हे आपण वाचू शकतो तो पण त्यांनी १५ वर्षांच्या वयात देशाच्या स्वातंत्र्यासाठी शत्रूला चाफेकर यांच्या मारेकऱ्यांना मारत मारत मरेल अशी त्यांनी शपथ घेतली होती. १४ वर्षे रोज चाबकाचे फटके खाऊन हे सुद्धा एकाप्रकारे बलिदान आहे. जसे क्रांतीकारकांनी गोळ्या खालल्या, फाशीवर गेले त्यासारखेच १४ वर्षे मरणयातना सोसणे येड्या गबाळ्याचे काम नाही. त्यामुळे मी राहुल गांधी यांना सांगतो, आपण देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत त्याला फाटे फुटू देऊ नका, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना फटकारले.

तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी महाराष्ट्रातील भाजपाला विचारतोय, तुम्ही मिंध्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढणार आहात का? असं असेल तर आम्ही मिंध्यांना नेता मानून निवडणुका लढणार आहोत, हे भाजपाने जाहीर करावं, असं म्हणतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला आव्हान दिलं.

भाजपला वाटतं की आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो. तर अरे तुमचे 152 कुळं खाली आली तरी ठाकरेंपासून शिवसेना वेगळी करु शकत नाहीत. प्रयत्न करून बघायचं असेल आणि हिंमत असेल तर तातडीने निवडणूक घ्या, हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मतं मागा. मी माझ्या वडिलांच्या नावाने मते मागतो. बघुया महाराष्ट्र कुणाला कौल देतो, असंही आव्हान ठाकरे यांनी यावेळी भाजपला दिलं.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना ठाकरे म्हणाले, स्वत:कडे कर्तृत्व शून्य असताना ते गद्दारी करून मुख्यमंत्री झाले. त्यांना अजूनही माझ्या वडिलांचं नाव वापरावं लागतंय, ही तुमची हार आहे, तुमचा पराभव आहे. ज्या शिवसेनेनं तुम्हाला राजकारणात जन्म दिला. त्या राजकारणातल्या जन्मदात्या आईच्या कुशीवर वार करणारे हे सगळे चोर भगवा अन् धनुष्यबाण घेऊन फिरत आहेत. पण गद्दारांच्या हातात भगवा शोभतं नाही. माझ्यावर प्रेम करणारा एक माणूस तुम्ही नेऊ शकला नाही. एक शिवसैनिक नेऊ शकला नाही. पण तुमच्या कपाळावर कायमचा हा शिक्का बसला आहे.