‘रुग्णवाहिकेत कोंबून 22 मृतदेहांची मृत्यूनंतरची अवहेलना संतापजनक !'- पंकजा मुंडे

बीड, (प्रबोधन न्यूज) - '22 लोकांचा मृतदेह सामाना प्रमाणे कोंबून भरून अंत्यविधीसाठी पाठवण्यात आला. ही एक भयानक घटना अजून कुठली नसून माझ्या बीड जिल्ह्याची आहे. या घटनेबद्दल मी दुःख व्यक्त करावं की संताप व्यक्त करावं हे मला कळत नाही !' असा उद्वेगजनक उदगार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काढला.
बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेतून एक दोन नव्हे तर 22 मृतदेह कोंबून त्यांची वाहतूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: जातीने बीड जिल्ह्याकडे लक्ष द्यावे. कारण त्यांनी ज्यांच्याकडे जबाबदारी दिलीय ते त्यांचे योग्य कर्तव्य बजावत नाहीयत, अशा शब्दात पंकजा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
'राजकारण करण्याची माझी भूमिका कधीच नव्हती. कधीही मी भूमिका घेत असताना धाडसी भूमिका घेतली आहे. कारण ती जनतेच्या हिताची आहे. कदाचित स्वतःचं नुकसान केलं असेल, पण मी माझी भूमिका प्रभावीपणे आणि स्पष्टपणे मांडल्या आहेत. आज बीड जिल्ह्यामध्ये जे चाललंय ते पाहून माझी हात जोडून विनंती आहे. मुख्यमंत्री महोदयांना आदरणीय शरद पवार साहेबांना, अजित पवारांना मी विनंती करते, आपण बीड जिल्ह्याकडे कृपया जातीने लक्ष द्यावे.' अशा शब्दात पंकजा यांनी आपला संताप व्यक्त केला.